शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरसावले २० वर्षीय तरुण शेतकरी विनायक हेगाणा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरसावले 
२० वर्षीय तरुण शेतकरी विनायक हेगाणा

Tuesday May 10, 2016,

4 min Read

भारत हा शेती प्रधान देश आहे व या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत विषय आहे. वृत्तपत्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता लोकांच्या सरावाच्या झाल्या आहे पण विदारक सत्य म्हणजे आत्महत्या करणारा शेतकरी हा एकटाच आपला जीव देत नाही तर त्याच्यामागे त्याचे कुटुंब सुद्धा तीळतीळ मरत असते. हे दुखद स्वप्न त्यांच्यासाठी आयुष्यभराचा एक शाप ठरतो. एका शेतकऱ्यांचा त्रास हा दुसऱ्या शेतक-यापेक्षा कोण जास्त चांगले समजू शकतो? महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये राहणारे २० वर्षीय विनायक चंद्रकांत हेगाणा यांनी बीएससी अॅग्रीकल्चरचे शिक्षण घेतले व शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. विनायक यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की शेतकरी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करायला विवश होतो, म्हणून ते महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांना हिंमत देऊन आत्महत्या करण्यापासून त्यांना परावृत्त करतात व त्यांना समजावतात की आत्महत्या हा काही त्यावर पर्याय नाही. ही मोहीम ते एकटेच राबवत नाही तर त्यांची तीन हजार तरुणांची एक टीम आहे ज्यात जास्तीत जास्त विद्यार्थी असून त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे.

image


विनायक यांनी कोल्हापुरातील सरकारी शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे वडिल शेतकरी असल्यामुळे त्यांना पण लहानपणापासून शेतीची आवड आहे. शिक्षण घेत असतांना सुट्ट्यांमध्ये वेळ मिळेल तेव्हा ते वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचे. हेच एक कारण आहे की त्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख अगदी जवळून बघितले आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. त्या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती बघून विनायक यांनी शेतकऱ्यांच्या समस्येच्या समाधानासाठी ‘शिवार संसद’ नामक एक संस्था उघडली. या मोहिमेत त्यांना तरुण विद्यार्थ्यांची मोलाची साथ मिळाली.

image


विनायक जेव्हा आपल्या संस्थेच्या कामासंदर्भात शेतकऱ्यांशी वार्तालाप करतांना शेतकऱ्यांच्या एका समुदायाने त्यांना सांगितले की राज्यात या आधीपण दुष्काळ व पुर यायचा पण त्यावेळेस शेतकरी आत्महत्या करीत नव्हते पण आज परिस्थिती बदलली आहे. विनायक सांगतात की, पूर्वी लोकांमध्ये एकी असल्यामुळे ते आपल्या अडचणी एकमेकांना सांगून त्यावर तोडगा शोधून काढायचे. यामुळे त्यांच्या अडचणी आपापसात बसून विचारविनिमयाने सुटत असे. आजच्या परिस्थितीत शेतकरी बंधू एकमेकांशी स्पर्धा करू लागला आहे त्यामुळे त्यांच्यातील एकोपा कमी झाला आहे. ओल्या व कोरड्या दुष्काळामुळे त्यांची पिके संकटात येतात व शेतकऱ्यांवर बँक आणि सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी दबाव वाढू लागतो. प्रसंगी घरच्यांचा पाठींबाही कमी पडू लागतो. या सगळ्या परिस्थितीत शेतकरी स्वतःला एकटा समजतो आणि निराशेपोटी तो आत्महत्येचे पाऊल उचलतो.

image


विनायक सांगतात की अश्या परिस्थितीत शेतकऱ्याला मदतीची गरज असते. त्याला हिंमत देऊन प्रेमाने समजावले पाहिजे की विपरीत परिस्थितीचा सामना कसा करायचा. आतापर्यंत विनायक यांनी अनेक शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. विनायक सांगतात की, “सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते परंतु त्याच्या योग्य प्रचाराच्या अभावाने शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळत नाही. सध्या एकट्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी ३.५ लाख एनजीओ कार्यरत असून सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा हक्क पोहचू शकत नाही. जो शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या कुटुंबाला सरकार व अन्य संस्थांद्वारे आर्थिक मदत पुरवली जाते व कालांतराने त्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ च होते.”

image


विनायक यांना वाटते की आपण शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीऐवजी रोजगार मिळवून देण्याची सोय केली पाहिजे. कारण शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही पण आम्ही त्यांची संवादाच्या माध्यमातून मदत करतो. आमची टीम गावात फिरून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सरपंच व ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या रोजगाराची याचना करतो. विनायक शेतकऱ्यांना सांगतात की, “आम्ही तुमच्या मुलांप्रमाणेच आहोत, कोणतेही आई-वडिल मुलांना एकटे टाकत नाही. आम्ही त्यांना समजावतो की आत्महत्या कुठल्याही अडचणीवरचा उपाय नाही पण अडचणींचा सामना करूनच त्यावर मात केली पाहिजे.”

image


शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी विनायक यांनी संस्थेच्या नावाने एक वेबसाईट सुरु केली आहे ज्यामुळे लोकांची जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळू शकेल. वेबसाईट बनवण्यासाठी त्यांनी आपले महाविद्यालयाचे प्राचार्य कबीर खराडे यांची मदत घेतली जे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये संगणक शास्त्राचे प्राध्यापक आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कबीर खराडे यांनी ‘शिवार संसद’ नावाची वेबसाईट बनवली ज्यामार्फत ते शेतकऱ्यांसाठी निधी गोळा करतात तसेच ते लोकांना आव्हान करतात की तुम्ही शेतकऱ्यांशी प्रेमाने बोलून त्यांची हिंमत वाढवा ज्याने ते आत्महत्येच्या विचारापासून दूर राहतील.

वेबसाईट – www.shivarsansad.com

अश्याच काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourSTORY Marathi Facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा :

आयटी उद्योगातून आलेल्या कर्मचाऱ्यांची शेती उद्योगात यशस्वी इनिंग- अक्षयकल्प फार्म्स

७० वर्षाच्या अमला रुईया यांनी राज्यस्थानच्या २०० दुष्काळग्रस्त गावात केली हरितक्रांती  

इंग्लंडमध्ये 'एमबीए'चे शिक्षण पूर्ण करून आपल्या गावातील चारा छावण्यांचा प्रश्न मार्गी लावणारा अमेय पाटील 

लेखिका - गीता बिश्त

अनुवाद – किरण ठाकरे 

    Share on
    close