वुई मस्ट सॅल्यूट टू अ रिअल हिरो: दिपचंद प्रख्यात!

वुई मस्ट सॅल्यूट टू अ रिअल हिरो: दिपचंद प्रख्यात!

Thursday November 05, 2015,

7 min Read

देशासाठी लढणारे सैनिक अनेकदा आपले प्राण देतात, शहीद होतात अनेकजण कायमचे अपंग होतात. युध्दात अपंगत्व येणा-या जवानांची एक वेगळीच ओळख राहते पण युध्दात असामान्य कामगिरी करत मृत्यूच्या जबड्यात जाऊन सहीसलामत बाहेर येणा-या आणि नंतर अपघातात स्वत:चे दोन पाय एक हात गमावलेल्या सैनिकाची वेदना किती मोठी असते याचे याची डोळा प्रत्यंतर येते ते ‘दिपचंद प्रख्यात’ या माजी अपंग सैनिकाची भेट घेतल्यावर! १८८९ लाइट रेजिमेंट मधील ‘गनर’ चे काम करणारा हा बहादूर सैनिक कारगिल युध्दात लढला, काश्मिरमध्ये लष्कराच्या गुप्तहेर खात्यात अभिमनास्पद जोखमीची कामगिरी पार पाडत, राजस्थानात युध्दजन्य परिस्थितीत सीमेवर तैनात झाला. त्याच्या या जीवनप्रवासाची हकीगत ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. नाशिकरोड येथील देवळाली कँम्प मध्ये जनरल स्टोअर चालवून आपल्या दोन मुलांना डॉक्टर करण्याचं स्वप्न बाळगणा-या या वीराला आजही कुणाच्या मदतीची अभिलाषा नाही. आजही त्याच्या शब्दाशब्दात जाणवते देशप्रेम, नम्रता,धिरोदात्त इमानदार सैनिकीवृत्ती! प्रसंगी दहशतवादाशी आणि मृत्यूशीदेखील लढणा-या या ‘रिअल हिरो’ची कहाणी जाणून घेवूया!

१८८९चे सेना मेडल प्राप्त रिटायर्ड कर्नल जी.के मेहंदीरत्ता यांनी दिपचंद ज्या तुकडीत काश्मीरमध्ये काम करत होते, तीचे नेतृत्व केले होते. आपल्याबद्दलची माहिती आपले भूतपूर्व कमांडिंग ऑफिसरच देतील असं दिपचंद आजही सांगतात आणि असामान्य शौर्य गाजवणा-या वीरामधील आपल्या सैन्याधिका-याबद्दलची निष्ठा तसचं नम्रता आजही कायम असल्याचे स्पष्ट होते. १९९८ साली काश्मीरमध्ये दहशतवाद जोरात होता, गुलमर्ग जवळच्या तंगमर या ठिकाणी दिपचंद यांच्या१८८९ लाईट रेजीमेंट मधील जवान तैनात होते. कर्नल गिरीश कुमार मेहंदीरत्ता सांगत होते. ‘दिपचंद सारखा सैनिक मिळणे दुर्मिळच’ असं पालुपद त्यांच्या दर चार-दोन वाक्यांनंतर सुरूच होत. दिपचंद त्यावेळी इतर पाच-सहा जणांसोबत बटालियन इंटेलिजन्स मध्ये वेशांतर करून काश्मिरी लोकांमध्ये मिसळला होता. अतिरेक्यांच्या गुप्त ठिकाणांचा पत्ता स्थानिक लोकांमध्ये राहून शोधायची जोखिम त्यांच्यावर आणि इतर चार सहका-यांवर होती. या तुकडीत तो प्रमुख होता. तेथे हत्यार जवळ बाळगता येत नाही, काश्मिरी वेशभूषा,भाषा शिकून या वीरांचे पाच-सहा महिन्याचे गुप्तवार्ता देण्याचे प्रशिक्षण झाले होतेच! दिपचंद आणि त्यांच्या टिमने ‘डारागाम’ या दुर्गम ६०-७० घरांच्या गावात अतिरेकी हालचाली दिवसाढवळ्या होतात याचा माग काढला.

दिपचंद यांची माहिती खरी निघाली, रात्री लष्कर सक्रिय असते म्हणून एका घरात दिवसा अतिरेकी येऊन राहात होते. ‘या माहितीची खातरजमा आम्ही केली.’ कर्नल मेहंदीरत्ता म्हणाले, ‘आम्हाला दिवसा कारवाई करण्यासाठी वरिष्ठांचे आदेश मिळत नव्हते. सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये अन्यथा रोष लष्करावर येईल म्हणून प्रथम वरिष्ठ परवानगी देत नव्हते. पण आमची माहिती खरी होती कारवाई दिवसाच करायला हवी होती ब-याच वेळानंतर आम्ही हमीपूर्वक परवानगी मिळवली. आणि वेशांतर करून कमांडो त्या गावात घेरा टाकून बसले. घराघरात शोध सुरू झाला. एका घरात लष्करी जवान चौकशीला गेले, तेंव्हा खालच्या मजल्यवरच्य़ा बायका विनाकारण जोरजोरात आवाज करून बोलत होत्या म्हणून मेजर नंबीयार यांना शंका आली. ते तडक वरच्या मजल्यावर पोहोचले. तर रजयांच्या ढिगा-यामागे २-३ अतिरेकी लपले होते. त्यांनी गोळीबार करत लष्कराला प्रतिकार केला. तातडीने जवान खाली आले. काही तासात सारे बळ त्या घराभोवती वेढा देऊन एकवटले, तो पर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते’ कर्नल मेहंदीरत्ता सांगत होते.

दिपचंद प्रख्यात

दिपचंद प्रख्यात



‘रात्री आठ वाजता आम्ही हल्ला चढवला. घरातील इतरांना अटक केली आणि दोन अतिरेक्यांवर रात्रभर फायरींग सुरू होते. सकाळी ते दोघे मृत पावले, आमचाही एक वीर अवतारसिंग शहिद झाला. एक अधिकारी जखमी झाला.’ ‘हे ऑपरेशन डारगाम’ त्यावेळी मिडियातही गाजले’ आमच्या दोन वर्षाच्या वास्तव्यात आम्ही तो परिसर शून्य दहशतवादी इलाका केला होता ते केवळ दिपचंद यांच्यासारख्या जाबाज जवानामुळेच!’ कर्नल पुन्हा-पुन्हा सांगत होते. हे लोक स्थानिका़मध्ये मिसळले होते त्यामुळे ४० स्केअर किलोमीटर मधील पन्नास गावात अतिरेकी कारवायांवर नियंत्रण सहजपणाने मिळवता येत होते.’ असे कर्नल अभिमानाने सांगतात.

कारगिलच्या ऑपरेशन विजय मध्येही आमच्या तुकडीचा समावेश होता. मे-जून१९९९ मध्ये सीमेवर आम्ही तैनात होतो त्यावेळी आमच्याकडे १२० मि मी मोटर्स या शत्रूच्या प्रदेशात आठ किलोमीटर दूरवर मारा करणा-या तोफा होत्या. तसेच शत्रूचे गोळेही आमच्याकडे येऊन पडत होते. दिपचंद यांनी त्यावेळीही कर्तृत्व गाजवले. त्याने १५हजार गोळे डागले. दुश्मनचा गन टारगेट करणे, हेच त्याचे काम होते.’

त्यानंतर संसदभवनावर हल्ला झाला आणि युध्दजन्य परिस्थिती होती. आमच्या तुकडीला राजस्थान सीमेवर तैनात करण्यात आले. पोखरणमध्ये केव्हाही युध्द सुरू होईल अशी स्थिती होती आम्ही तयार होतो, पण पुढे चर्चा झाल्या आणि तणाव निवळला. आमची सामानाची बांधाबाध सुरू होती. बारमेड इलाख्यात मिसफायर गोळे पडले होते. त्यातील एक गोळा फुटला त्यात आमचे तीन वीर जखमी झाले त्यात दिपचंदही होता!’

कर्नल मेहंदीरत्ता भावूक झाले. ‘जो मुलगा काश्मीरमध्ये, कारगीलमध्ये मृत्य़ूच्या जबड्यात कर्तृत्व गाजवून आला, तो या स्फोटात जखमी झाला. इतका की, डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची शुन्य आशा आहे असे सांगितले.’ ‘काहीही करा पण हा जगला पाहिजे, आम्ही डॉक्टरांना आग्रह करत होतो. डॉक्टर म्हणाले, ‘याचा खूप रक्तस्त्राव झाला आहे, याचे दोन्ही पाय, एक हात कापावा लागेल, तरीही त्याच्या जगण्याची खात्री देता येणार नाही.’ ‘ आम्ही त्यालाही तयार झालो’ कर्नल सांगत होते. परमेश्वराची प्रार्थना केली, सायंकाळी चार वाजता ऑपरेशन झाले, दुस-यादिवशी दिपचंद शुध्दीवर आला. पाय गेले, हात गेला, पण त्याने कधीच हळहळ व्यक्त केली नाही. त्याच्यासारखी धिराची माणसं खूपच कमी असतात.’ ‘मी सांगतो, कर्नल सांगत होते, ‘मी त्याच्या जागी असतो तर पाय गेले या कल्पनेनेच माझे प्राण गेले असते.’

‘आज तो स्वयंपूर्ण जीवन जगतोय. आम्ही रिटायर्ड झालो पण कुटूंबियासारखेच संपर्कात आहोत. त्याची मुले शिकताहेत.पत्नीला खूप प्रयत्नानंतर सरकारी नोकरी मिळाली आहे. देवळाली कँम्प मध्ये तो दुकान चालवतो.’ पण दिपचंदच्या कहाणी बद्दल तुम्ही विस्ताराने लिहा, नकारात्मक लिहू नका. तो खरोखर लढाऊ सैनिक आहे.’ असं शेवटपर्यंत कर्नल गिरीशकुमार सांगत राहिले.

नाशिकरोडच्या देवळाली कँम्प भागातील दिपचंद यांच्या दुकानात पोहोचलो तेंव्हा हा वीर आपल्या मांड्यापर्यंत कापलेल्या पायांवर उभा राहून आमचीच वाट पहात होता. आम्ही प्रथमच त्याना भेटत होतो, पण जणू जुने मित्र खूप दिवसाने भेटावे, त्या उतावीळ प्रेमाने ते बोलत होते.

आता पुढे काय? म्हणून बोलता बोलता प्रश्न केला, मुलांना डॉक्टर करायचे आहे. का? म्हणून विचारले तर मृत्य़ूशी झगडून मी हा असा जीवंत आहे, ते केवळ डॉक्टरांमुळेच. असे त्यांनी सहजपणाने सांगितले! रूग्णालयात माझ्यासोबत शेकडो जायबंदी सैनिक होते, काहीजण जीवंत प्रेतच होते, काहीना आधाराशिवाय उठता येत नव्हते. या सर्वांपेक्षा मी खूपच भाग्यवान, मला पाय नाहीत तरी मी चालतोय,जगतोय, दिपचंद आनंदाने सांगत होते. ‘अगर दुसरो का हमे कुछ देखना है तो निचेवाले लोगोंकी तरफ देखो, पता चलता है, की हम कितने सुखी है’ जीवनाच हे तत्वज्ञान कुठल्या गुरू जवळून नाही, मानवी शरीराच्या एका जिवंत तुकड्यामधून बाहेर पडत होते. त्यांच्या गोष्टी संपतच नव्हत्या. वीस मिनिटांची मुलाखतीची वेळ दोन तास झाले तरी संपतच नव्हती. ‘तुम्ही नेहमी या! भेटा’ असं ते वारंवार सांगत होते.


image


युध्दात साथ संगत असणारे सहकारी आता जवळ परिसरात आले तरी भेटायचे टाळतात. कित्येक अपंगाना तर त्यांच्या पत्नी-कुटूंबियांनीच नाकारले आहे. पण मी भाग्यवान आहे, आजही मी माझी पत्नी मुले एकत्र राहतोय. अजून काय हवे? असं तेच आम्हाला विचारत होते. तेव्हा खरोखर मनात त्यांना उठून सँल्यूट करावेसे वाटले. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. दहा दिशातून तुफान व्हायचे सदैव सैनिका पुढेच जायचे’ या ओळी केवळ आपण ऐकतो, पण दिपचंद त्या प्रत्यक्षात जगतात. देशाच्या शत्रूंशी लढणारा, मृत्यूला हरवून नियतीशी टक्कर देणारा सैनिक दिपचंद!

त्यांचं दुकान दोन वर्षापूर्वी आगीच्या भक्षस्थानी पडलं. तीन-चार लाखांचं नुकसान झालं. पण हा बहादूर डरला नाही. पुन्हा उभा राहिला. पाय नसलेला हात गमावलेला एक माणूस इतक्या धडाडीने जगतोय. आपल्या तीन चाकीवर कुणाची मदत न घेताच बसतो, तेही उत्साहाने, जीवनाला सलामी देत! ‘वापस आओगे तो जादा समय निकालके आना’ म्हणत त्यांचा आग्रह सुरू असतो. त्यांच्या या आगत्यपूर्ण वागण्याचं आश्चर्य़चं वाटत राहत. भारत सरकार कडून काहीच मदत मिळाली नाही का? यावर ते अगदी त्रोटक उत्तर सहजपणाने निर्विकारपणाने देतात, ‘वो वॉर मे नही हुआ ना!’

अण्णा हजारेंच्या आंदोलनावरही ते सहजपणाने बोलतात, म्हणतात की ‘क्या करेंगे ये लोग इतना पैसा कमाकर कहा जायेंगे!’ अण्णांच्या भ्रष्टाचारच्या लढ्यात सा-या लष्कराचा पाठिंबा असल्याचे ते सांगतात. मुळच्या हरियाणाच्या हिस्सार मधील हा बहादूर सैनिक लष्करी प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रात आला. देशासाठी काश्मीर, राजस्थानात लढला आणि पुन्हा इथेच स्थायिक झाला आहे. आपल्या किराणा स्टोअरमधून बसल्या बसल्या संगणकाव्दारे रेल्वे बुकींग, बस- विमान तिकीटे, मोबाईल रिचार्ज, जीवन विमा प्रिमीयम आणि सर्व प्रकारची देयके अदा करण्याची सुविधा देण्याचे काम ते करतात. या कामात सायंकाळी पत्नी मुलेही सहभागी होतात.असे ते आनंदाने सांगतात. तेंव्हा जाताना या वीराला उठून खरोखर सलाम करावासा वाटतो. ‘ वुई मस्ट सँल्यूट अ रिअल हिरो दिपचंद प्रख्यात’ म्हणूनच म्हणावस वाटतं!

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा 

    Share on
    close