शिक्षण पद्धती रंजक करण्याची 'बॅकबेंचर्स'ची चळवळ

शिक्षण पद्धती रंजक करण्याची 'बॅकबेंचर्स'ची चळवळ

Sunday November 29, 2015,

4 min Read

वर्गात मागच्या बाकावर बसणारी मुलं अभ्यासात कच्ची असतात, आयुष्यातही ही मुलं मागेच राहतात, अशी तुमची समजूत आहे का ? काही नवं करण्याची त्यांची पात्रता नसते असा विचार तुम्ही करता का ? असा विचार तुम्ही करत असाल तर तुमची समजूत पूर्ण चुकीची आहे. कारण अशी अनेक मंडळी समाजात आहेत जी वर्गात नेहमी मागे बसत होते. पण आपले नवे विचार आणि कल्पना यांच्या जोरावर ते आयुष्यामध्ये यशस्वी झाले आहेत.

एमसी जयकांतही अशाच मुलांपैकी एक. जयकांत नेहमी बॅकबेंचर्स होते. त्यांना परिक्षेतही सामान्य गुण मिळत असतं. शाळा संपल्यानंतर त्यांनी एका खासगी इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्गात असताना विद्यार्थ्यांना डिझाईन आणि फॅब्रीकेशन संबंधीचा प्रोजेक्ट देण्यात आला होता. त्यावेळी आजवर कुणीच बनवलं नाही असं बनवू या, असा विचार जयकांत यांनी केला. काही तरी नव्या करण्याच्या इच्छेपोटीच त्यांनी ब्लेडलेस विंड टर्बाइन हा विषय प्रोजेक्टसाठी निवडला. काही दिवसानंतर सेमिनार हॉलमध्ये प्रोजेक्ट सादरीकरणाची तयारी सुरु आहे, अशी माहिती जयकांत यांना मित्रांकडून समजली. हे समजतात जयकांत सेमिनार हॉलमध्ये गेले आणि मागे जाऊन बसले. एसी हॉलमध्ये आरामात वेळ जावा हा त्यांचा मागे बसण्याचा हेतू होता. जयकांतकडे कुणाचंही लक्ष गेलं नव्हतं. पण कॉलेजच्या कर्मचा-यानं त्यांना पाहिलं. त्यावेळी आपलं प्रेझेंटेशन तयार आहे, आपण ते सादर करु शकतो, इथं आपण त्याचं उद्देशानं आलो आहोत असं जयकांत यांनी त्या कर्मचा-याला सांगितलं. जयकांत यांना हे बोलणं फार गंभीरपणे घेतलं जाणार नाही, याची खात्री होती. पण घडलं वेगळंच. थोड्याच वेळात त्यांच्या नावाची घोषणा झाली. आपलं नाव ऐकताच जयकांत सुरुवातीला थोडे घाबरले. स्वत:ला कसंबसं सावरत ते स्टेजवर पोहचले. त्यांनी पाच मिनिटे प्रेझेंटेशन सादर केलं. आठवडाभरानंतर या सादरीकरणाचा निकाल लागला. जयकांत यांना सर्वात जास्त गुण लागले होते. जयकांत यांच्यासाठी देखील ही बातमी धक्कादायक होती. त्यांनी याचा कधी विचारही केला नव्हता. हे असं कसं घडलं ? असा प्रश्न ते स्वत:लाच विचारत होते. एखाद्या परिक्षेत पहिल्यांदाच ते पहिले आले होते. त्यामुळे जयकांत यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये पहिला क्रमांक मिळवणं ही नक्कीच फार मोठी बाब नाही. पण ही घटना जयकांत यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईट ठरली. यानंतर जयकांत यांनी स्वत:ला प्रश्न विचारायला, स्वत:चीच परीक्षा घेण्यास सुरुवात केली. महाविद्यालयातल्या तसंच आंतरमहाविद्यालयीन प्रेझेंटेशन स्पर्धेत ते सहभागी होऊ लागले.

याच दरम्यान जयकांत आपल्या मित्रांसोबत गोव्याला गेले होते. गोव्याहून चेन्नईला परत येत असताना वेगवेगळे विचार त्यांच्या डोक्यात येत होते. डोक्यात येणा-या सर्व कल्पक आयडियांची लेखी नोंद करायची हे त्यांनी चेन्नईत परतल्यानंतर ठरवले. त्याच आयडियांवर काम करण्याचा त्यांनी निर्धार केला. सध्याचे विद्यार्थी वेगळा विचार का करत नाहीत ? हा विचार त्यांना नेहमी सतावत असे. अनेक विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत. तरीही स्वत:भोवती एक कुंपण का बांधून घेतात. याचं उत्तर जयकांत यांना शोधायचं होतं. आपल्या शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी असलेली जुनी पद्धत याला कारणीभूत आहे, हे त्यांना जाणवले. सुरुवातीपासूनच मुलं केवळ अभ्यासावर जोर देतात. काही तरी नवं करावं असं त्यांना वाटत नाही. चांगले गुण मिळवण्याच्या या स्पर्धेत मुलांनी काय शिकलं ? याचा विचार कुणीच करत नाही. केवळ घोकंपट्टी करुन चांगले गुण मिळवणं अनिवार्य आहे का ? चांगले गुण मिळवण्याच्या या अट्टहासापोटी शिकताना जो आनंद घ्यायचा असतो त्यापासून आपण वंचित राहतोय का ? असे प्रश्न जयकांत यांना सतावत होते.

या विचारमालिकेनंतर जयकांत यांना उत्तर सापडलं होतं. हेच उत्तर त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित केलं. आता ते नव्या पिढीसोबत याच उत्तराच्या दिशेनं तर्कसंगत काम करणार होते. विद्यार्थ्यींनी कोणताही अभ्यास तर्कसंगत पद्धतीनं करावा. ज्यामुळे अभ्यासामध्ये खरोखरच मजा येईल. तसंच त्यांना विषयही सहज समजेल. अभ्यासाचा अर्थ केवळ चांगले गुण मिळवण्याइतका मर्यादित नाही. अभ्यासाचा योग्य उपयोग व्हायला हवा. जयकांतनी आपले हे विचार मित्रांसोबत शेअर केले. त्यावेळी सर्व ताबडतोब या विषयावर काम करण्यासाठी तयार झाले. त्यानंतर जयकांत यांनी १५ डिसेंबर २०१३ या दिवशी आपल्या मित्रांसोबत ‘इंफाइनाइट इंजिनिअर्स’ या संस्थेची स्थापना केली.

इंफानाईट इंजिनिअर्सचं महत्व व्यावहारिक विज्ञानावर मुलभूत प्रयोग करणं हे होतं. मुलांनी काही तरी नवा विचार करावा, त्यांची विचारपद्धती रचनात्मक व्हावी या उद्देशानं त्यांनी ही संस्था सुरु केली.

जयकांत आणि हरीश यांच्याशिवाय एस.जयविग्नेश, ए.किशोर बालगुरु आणि एन. अमरीश हे देखील इंफानाईट इंजिनिअर्सचे सहसंस्थापक आहेत. ही संस्था सध्या रोबोटिक आणि एरो मॉडेलिंगचं शिक्षण मुलांना देते. इंफानाईट इंजिनिअर्सचा उद्देश मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमाशी निगडीत असं उपयुक्त शिक्षण देणं हा आहे. मुलांचं शिक्षण हे पुस्तक आणि फळ्यापुरतचं मर्यादीत राहु नये. त्यांना त्याचा व्यवहारातला उपयोगही समजला पाहिजे. शिक्षण त्यांना ओझं नाही तर मजेदार अनुभव वाटावा या उद्देशानं ही संस्था स्थापन करण्यात आलीय.

या कंपनीनं सुरुवात दोन शाळांपासून केली. आज चेन्नईतल्या जवळपास ८० शाळांसोबत कंपनीचं काम सुरु आहे. लवकरच उपयोगिता विज्ञान संशोधन संस्था सुरु करण्याच्या दिशेनं कंपनीचं काम सुरु आहे. ज्यामुळे कोणत्याही शाळेतल्या मुलांना या संस्थेमध्ये येऊन शिक्षण घेता येईल. तसंच त्यांच्यातल्या कल्पकतेला भरारी मिळेल.

image


यशाचं श्रेय

कंपनीचे सर्व कर्मचारी आपल्या निंदकांना यशाचं श्रेय देतात. त्यांच्या टिकेमुळे काम करण्याची प्रेरणा मिळते असं ही मंडळी सांगतात. इंफानाईट इंजिनिअर्स हा एक व्यर्थ प्रयत्न आहे,तो फारसा चालणार नाही अशी टीका एकदा एका प्राध्यापकाने केली होती. या प्राध्यापकांची टीकेनंतर इंफानाई इंजिनअर्सच्या सदस्यांना आणखी जोमानं काम करण्याचं बळ मिळालं. त्यामुळे ही सर्व मंडळी यशाचं श्रेय त्या प्राध्यापक महोदयांना देतात. ज्यांनी त्यांना काम करण्याचं ध्येय आणखी मजबूत केलं.

अभ्यास करण्याची खरी पद्धत काय आहे हे वर्गात मागे बसणारे विद्यार्थीच सांगू शकतात. कारण शिक्षकांच्या कोणत्या बोलण्यामुळे वर्गात झोप येते याचं रहस्य याच मुलांना माहिती असंत.


मुळ लेखक – आशुतोष खंतवाल

अनुवाद – डी. ओंकार