ऑपरेशन थिएटरच्या प्रकाशात मेंदूची शस्त्रक्रिया करणारे डॉ. रंगनाथम कंदिलाच्या प्रकाशात करत होते अभ्यास

शाळेत ना बसायला बाक ना लिहायला टेबल... जमिनीवर बसूनच झाला अभ्यास... त्यांचे घर म्हणजे एक छोटीशी खोली, ज्यात राहायचे सात जण... गावात वीज नव्हती म्हणून कंदिलाच्या प्रकाशातच अभ्यास करणे भाग होते... यशप्राप्तीच्या मार्गात ना गरिबी आड आली ना ग्रामीण भागात झालेले संगोपन... प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर केली प्रत्येक संकटावर मात.... डॉक्टर झाले आणि आता करत आहे हजारो रुग्णांच्या मेंदूची शस्त्रक्रिया...आतापर्यंत केल्या आहे एकोणीस हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया...त्यांच्या गावातल्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांवर केली जाते मोफत शस्त्रक्रिया.. मेंदूरोग विशेषज्ञ डॉक्टर रंगनाथन यांची प्रेरणादायी कहाणी

ऑपरेशन थिएटरच्या प्रकाशात मेंदूची शस्त्रक्रिया करणारे डॉ. रंगनाथम कंदिलाच्या प्रकाशात करत होते अभ्यास

Monday May 30, 2016,

9 min Read

गरीब परिवारात जन्म झालेला एक मुलगा जेव्हा आपल्या गावातील गरीब आणि आजारी लोकं इलाज करण्यासाठी तरफडत असल्याचे पहात असे तेव्हा त्याचे बाल मन विचलित होत असे. गावात प्राथमिक चिकित्सा केंद्र होते, मात्र तिथे डॉक्टर येत नसे. कुठल्याही छोट्या मोठ्या आजारासाठी गावक-यांना पाच किलोमीटर दूर जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात जावे लागत असे. अनेकांकडे तर इतके पैसेही नसत की ते कुठले साधन करून जिल्हा रुग्णालयात जातील.  तिथला गरीबी हाच सर्वात मोठा आजार होता. या मुलाने उपचार करता आले नाही म्हणून लोकांना तडफडून मरतानाही पाहिले होते.

हा मुलगा बुध्दीमान होता. शिक्षणात हुशार होता. त्याने गावाच्या विवशता आणि लाचारीला पाहून निश्चय केला की, तो गावात डॉक्टर होऊन येईल आणि गावावाल्यांवर उपचार करेल. त्याचा निश्चय इतका पक्का होता की त्याने आपले लक्ष्य गाठण्यासाठी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. ना गरीबीला, ना आपल्या ग्रामीण राहणीमानाला आपल्या उद्दीष्टांच्या आड येऊ दिले. शाळा- महाविद्यालयातही प्रत्येक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत गेला. त्याने दहावी शालांत परिक्षा उत्तीर्ण केली. राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. गावापासून दूर मोठ्या शहारात राज्यातील सर्वात प्रसिध्द महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची योग्यता मिळवली. त्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश परिक्षेतही पहिल्याच प्रयत्नात प्राविण्य मिळवले. एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला. मग देशाच्या राजधानीत जाऊन तेथे एम्स मधून न्यूरो सर्जन म्हणून कौशल्य मिळवले. त्यानंतर हैद्राबादला येऊन प्रक्टिसही सुरू केली. आज त्यांची गणती देशातील सर्वात नामवंत आणि सिध्दहस्त न्यूरो सर्जन म्हणून केली जाते. गरीबीचा प्रभाव त्यांच्यावर असा पडला होता की, त्यांनी मेंदूचा डॉक्टर झाल्यावरच सुखाने श्वास घेतला.

image


ज्यांच्याबद्दल आपण इथे सांगतो आहोत ते आहेत देशातील विख्यात न्यूरो सर्जन डॉ पँडी पेद्दीगारी रंगनाथम! त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम गावातील किंतली गावात झाला. वडिल गरीब शेतकरी होते. आई गृहिणी होती शिवाय शेतीच्या कामात वडिलांना मदत करत असे. घर म्हणजे केवळ एक खोली होती. ज्यात आई-वडिल आणि सर्व पाच मुले राहात होती. स्वयंपाकघर, स्नानघर, शयनघर सारेकाही हीच खोली होती. रंगनाथम यांचे पालक दोघेही निरक्षर होते. त्यांना दोन भाऊ- बहिणी होत्या. रंगनाथम सर्वात लहान होते. एक मोठा भाऊ कसाबसा दहावी पर्यंत शिकला. पूरक परिक्षेत त्याने आपल्या उर्वरित विषयांमध्ये प्राविण्य मिळवले होते. कुटूंबाची इतकी ऐपत नव्हती की सर्वच मुलांना शिकवण्याची संधी मिळावी, त्यामुळे दोन मुले वगळली तर सारेच शाळेपासून दूरावले होते. रंगनाथम नशिबवान होते. त्यांना शाळेत घालण्यात आले होते. त्यांनी गावात सरकारी शाळेत शिक्षण पूर्ण केले. सरकारी शाळेची स्थिती देखील त्यांच्या घरच्या सारखीच होती. तेथेही त्यांना मातीच्या जमीनीवर बसावे लागत होते. पण रंगनाथम सर्वसाधारण मुलांसारखे नव्हते. ते खूप हुशर समजूतदार होते. त्यांच्या स्मरणशक्ती अचाट होती. एकदा शिक्षकांनी फळ्यावर काही लिहिले की,तो सारा ध डा ते स्मरणात जसाच्या तसा ठेवत होते. शिक्षक जे काही शिकवत ते रंगनाथम लक्षात ठेवत होते. त्यामुळे सारे शिक्षक त्यांच्यावर फारच खूश होते. त्यांनी त्यांची प्रतिभा, मेहनत, कुशाग्रता आणि गुण पाहून भाकीत केले होते की, हा मुलगा मोठा होऊन नक्कीच काहीतरी नाव कमावणार आहे. शिक्षक आणि इतर लोकानी कौतुक केल्यावर ते पाहून पालकांना आनंद होत असे. त्यांच्या मनात नव्या अपेक्षा निर्माण होत असत. त्यांना विश्वास होता की हा मुलगा मोठा होऊन त्यांची दु:ख दूर करेल.

रंगनाथम यांनी देखील त्यासाठी काही कसूर ठेवली नाही. मन लावून अभ्यास केला.रात्रंदिवस कोणतीही संधी गमावली नाही. मागास गाव असल्याने घरात वीज नव्हतीच. पण त्याने त्यांच्या निश्चयात काही फरक पडला नाही. त्यांनी कंदीलाच्या उजेडात अभ्यास केला. रंगनाथम यांच्या मेहनतीने रंगत आणली. पुढे जाऊन त्यांच्या कुशाग्रतेचा परिचय सा-या राज्यभर झाला. दहावीच्या परिक्षेत त्यांना तिसरा क्रमांक मिळाला. एक अतिमागास गावातील मुलगा लगेच बातमीच्या मथळ्यात चमकला. त्यांचे असे कौतुक झाले की मनाजोग्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांनी विजयवाडा येथे अंध्रा लॉयला महाविद्यालय निवडले. रंगनाथम म्हणाले की, “ मी शाळेत होतो त्याच वेळी मी या महाविद्यालयाच्या लौकीकाबाबत जाणून होतो. येथे ज्याला प्रेवेश मिळतो तो जरूर डॉक्टर किंवा अभियंता होतो. ,मलाही डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे मला तिसरा क्रमांक मिळाला त्यावेळी मी याच महाविद्यालयात आलो. डॉक्टर व्हायचे असल्याने जीव रसायन आणि भौतिक शास्त्र हे विषय घेतले.” विशेष हे देखील होते की आपल्या गावाच्या स्थितीचा रंगनाथम यांच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला होता की, त्यांनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला होता. त्याकाळी गावातील लोकांना फार दूर जाव लागे. त्यासाठी पावलो पावली ठोकरा खाऊनही त्यांना अनेकदा योग्य उपचार मिळत नव्हते. त्याचा रंगनाथम यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता.

image


आंध्रा लॉयला महाविद्यालयात आल्यावरही रंगनाथम यांना अनेक विचित्र समस्यांना तोंड द्यावे लागलेच. त्यांना इंग्रजी माध्यमात शिकायचे होते मात्र दहावी पर्यंत तेलगूमध्ये शिक्षण घेतल्याने पुढ्च्या शिक्षणातही त्यांना तेच माध्यम देण्यात आले. त्याने ते नाराज तर झाले मात्र त्यांनी आपला जोश कमी होऊ दिला नाही. पहिली तिमाही परिक्षा झाली त्यावेळी रंगनाथम यांचे गुण सर्वाधिक होते. त्याबाबतीत त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही मागे टाकले होते. सर्वांनी आता त्यांचे मोठेपण मान्य केले होते.

आणखी एक अडचण त्यांच्या समोर आली होती. त्याकाळात नक्षल आंदोलने जोमात होती सर्वत्र त्यांची चर्चा असे. ते श्रीकाकुलम जिल्ह्यातील होते आणि त्याकाळी हा नक्षलांचा गढ होता. त्यामुळे काही व्रात्य मुले त्यांना नक्षली म्हणून डिवचत असत आणि त्रास देत असत. पण परिक्षेतील चांगल्या कामगिरीतून त्यांनी त्या सा-यांची बोलती बंद केली होती. ते ईश्वराला खूप मानतात. धर्मावर विश्वास होता. त्यामुळे ते कपाळावर ‘नामम’ म्हणजे टिळा लावत असत. गरीब घरातून आले होते त्यामुळे हवाई चप्पल आणि सुती पँन्ट शर्ट वापरत असत. तीच त्यांची ओळख बनली होती.

आंध्र लॉयला माहविद्यालयातील शिक्षणा दरम्यान त्यांना वसतीगृहात रहावे लागे. विजयवाडा शहर त्यांच्या गावापासून खूपच दूर होते. महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांच्या गावाची, घरच्यांची त्यांना खूपच आठवण येत असे. त्यामुळे ते एकटेपणाचा अनुभव घेत असत. शहरी जीवनाशी जुळवून घ्यायला त्यांना बराच वेळ लागला. पण त्यांना आनंद होता की वसतीगृहात त्यांना वेळेवर जेवण दिले जात होते. शिक्षणाची चांगली सोय होती. शिकण्याची चांगली साधने होती. शिक्षकही चांगले होते आणि मदत करणारे होते.

image


सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की या शिक्षणाचा त्यांच्या घरच्यांवर काही बोजा नव्हता. दहावीला चांगले यश मिळाल्याने त्यांना नँशनल मेरीट शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यातून त्यांच्या शिक्षणाचा सारा खर्च होत होता आणि खाण्यापिण्याचा खर्चही निघत होता. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. नेहमीप्रमाणेच चांगले गुण आणि दर्जा मिळाला. अपेक्षेनुसार त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला, त्या दिवसांच्या आठवणीने ते आजही भावूक होतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. ते म्हणतात, की, “ त्यादिवशी सारे गाव माझ्या घराजवळ जमा झाले होते. सारे खुश होते. एका गरीब घरातील मुलगा डॉक्टर व्हायला निघाला होता”.

प्रवेश परिक्षा पास झाल्यावर रंगनाथम यांनी आंध्रा मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला. नेहमीप्रमाणे इथेही त्यांनी मनापासून अभ्यास केला. प्रत्येक वर्षी चांगले गुण मिळवले. जेंव्हा एमबीबीएसच्या दरम्यान इंटर्नशिपची वेळ आली तेंव्हा रंगनाथम यांनी सर्वांना आश्चर्य वाटेल असा निर्णय घेतला. त्यांनी प्रशिक्षणासाठी ‘न्यूरो सर्जरी’ हा विषय घेतला. रंगनाथम यांनी सांगितले की, “ ऐंशीच्या दशकात जेंव्हा मी न्युरो सर्जरीला माझा मुख्य विषय म्हणून घेतले त्यावेळी अनेकांनी मस्करी देखील केली. तसेही त्या काळात असे मानले जात होते की, ज्या रुग्णाला मेंदूशस्त्रक्रिया करावी लागे त्याचे फार थोडे आयुष्य राहिले आहे. मेंदूशस्त्रक्रिया म्हणजे जगण्याचा शेवटचा मार्ग होता. लोक चेंष्टेने म्हणत की, रुग्ण पायाने चालत जातो आणि बेशुध्द होऊन स्ट्रेचरवरून बाहेर येतो. त्या काळात शस्त्रक्रयेसाठी मोठ-मोठी साधने आणि तंत्रज्ञान नव्हते जसे आज आहे.” रंगनाथम पुढे म्हणाले की, “ न्युरो सर्जरीसाठी ज्यांना पाठवले जाई, त्यांची स्थिती वाईट असायची. कुणाचे हात-पाय पडलेले असत तर कुणाचा आवाज गेलेले असत. कुणाच्या मेंदूचे कामच बंद होत असे. मी असे डॉक्टर पाहिले की ज्यांनी अपंग आणि वाईट स्थिती मधल्या रुग्णांना अगदी ठिकठाक केले होते. मी ठरवले की मी सुध्दा हे आव्हान स्विकारेन.”

१९८१ मध्ये एमबीबीएस झाल्यावर रंगनाथम यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स मध्ये प्रवेशासाठी परिक्षा दिली, त्यावेळी देखील त्यांनी उपस्थित प्राचार्याना सांगितले की, त्यांना न्यूरो सर्जरीमध्ये निपुणता मिळवायची आहे, तेंव्हा तिथल्या प्रमुखांनी त्यांना महिनाभर वेळ घेण्यास आणि शांतपणाने विचार करण्याचा सल्ला दिला. या महिनाभरात रंगनाथम यांनी ‘एम्स’ च्या विद्यार्थ्यांसोबत बाह्यरुग्ण विभाग आणि दुस-या विभागात काम केले. पुन्हा महिनाभराने विचारणा झाली त्यावेळी देखील त्यांनी आपला मागचा निश्चय कायम असल्याचे सांगितले – न्यूरो सर्जरी. रंगनाथम यांच्या दुस-या गुरूंनी देखील त्यांच्या या निर्णयावर पुन्हा विचार करण्यास सांगितले. पण रंगनाथम ठाम होते. त्यांनी आपल्या मनात निश्चय केला होता.

रंगनाथम आज देशातील सर्वात प्रसिध्द न्यूरो सर्जनपैकी एक आहेत. ६१ वर्षांचे रंगनाथम आजपर्यंत मेंदू आणि मज्जातंतूबाबतच्या २९ हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया करुन मोकळे झाले आहेत. त्यांना या संख्येवर नाही त्यांच्या यशावर अभिमान वाटतो. रंगनाथम म्हणतात की, “ ईश्वरानेच मला सर्व काही दिले आहे. हातांचे कौशल्य ही देखील त्याचीच देणगी आहे. प्रत्येक शस्त्रक्रिया करण्या आधी मी ईश्वरांची प्रार्थना करतो की, मला रुग्णाला चांगला करण्यात यश दे”. न्यूरो सर्जन म्हणून प्रथम शस्त्रक्रियेबाबत विचारले असता ते म्हणाले की, एम्स मध्येच जीवनातील पहिली शस्त्रकिया केली होती. त्यावेळी ते वरिष्ठ निवासी आणि ड्युटी डॉक्टर होते. रावत नावाच्या माणसाचा अपघात झाला होता. त्याची स्थिती नाजूक होती. अनेक फ्रँक्चर झाले होते. मेंदूलाही मोठी दुखापत झाली होती. सल्लागाराने शस्त्रक्रिया करण्यास रंगनाथम यांना सांगितले होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रुग्ण बचावला. रंगनाथम म्हणाले की, “ माझ्यासाठी सुरुवात चांगली होती, माझा आत्मविश्वास वाढला”.

आता पर्यंतच्या सर्वात कठीण आणि आव्हानात्मक शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “ खूप दिवसांपूर्वी त्यांच्याकडे वेंकटरमणा नावाचा रुग्ण होता. त्याच्या मेंदूत ट्यूमर होता. छोटे तुकडे करून त्याना तो काढायचा होता. पूर्ण १५ तास शस्त्रक्रिया करावी लागली. त्या दरम्यान त्यांनी एक मिनिट देखील आराम केला नाही. सलग १५ तास त्यांनी काम केले आणि ट्यूमर काढला. रंगनाथम म्हणतात की, “वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गेला या घटनेला पण वेंकटरमना आजही माझ्याकडे तपासणीसाठी येतो. त्याला पाहून मला खूप आनंद होतो.” एम्स मधून उच्चस्तरीय शिक्षण आणि पदवी मिळाल्यावर रंगनाथम हैद्राबादला आले आणि तेथे त्यांना सरकारी रुग्णालय निजामस् इंस्टिट्य़ूट ऑफ मेडिकल सायंसेस म्हणजे नि्म्स मध्ये नोकरी मिळाली.

सल्लागार (न्यूरो सर्जरी) म्हणून त्यानी काम सुरू केले. पण काही वर्ष काम करून त्यांनी नोकरी सोडली आणि कॉर्पोरेट रुग्णालयात आपल्या सेवा देण्यास सुरुवात केली. रंगनाथम यांनी सरकारी रुग्णालयातील ती नोकरी सोडण्याच्या आपल्या त्या नि्र्णयाबाबत बोलताना सर्वात आव्हानात्मक निर्णय असल्याचे सांगितले. रंगनाथम म्हणाले की, “ माझी इच्छा नव्हती की, ते रुग्णालय सोडावे. पण स्थिती काहीशी अशी होती की, मला कॉर्पोरेट रुग्णालय मध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याचवेळी मला मुलगा झाला होता. मला वाटले की या नोकरीत राहून मुलांची नीट देखभाल करु शकणार नाही. मला वाटत नव्हते की माझ्या मुलांच्या शिक्षणात पैश्याची समस्या यावी. मुलासाठी मी निम्स सोडले”.

१९९ २मध्ये रंगनाथम यशोधा रुग्णालयात आले. तेंव्हा पासून आतापर्यंत ते येथे आपल्या सेवा देत आहेत. त्यांचा मुलगा आता मोठा झाला आहे. तो सुध्दा डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या वडिलांसारखे त्याने न्युरोसर्जन नाही तर कार्डियाक सर्जरीची निवड केली आहे. म्हणजे तो वडिलांसारखे मेंदूचे नाही तर हृदयाची शस्त्रक्रिया करेल. एका प्रश्नाच्या उत्तरात रंगनाथम म्हणाले की, “ आवश्यक नाही की प्रत्येकाने न्युरो सर्जनच व्हावे. हा चांगला सन्मानजनक पेशा आहे. डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवितात. माझा तर सल्ला असेल की नव्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात डॉक्टर व्हावे. कुणी डोळ्याचे,कुणी नाक कुणी कानाचे. ज्याला ज्यात रुची असेल आणि आनंद असेल त्याने त्यात काम करणेच योग्य आहे.”

रंगनाथम यांची आणखी एक मजेदार आणि विशेष गोष्ट आहे. ती अशी की, इतर डॉक्टरांच्या विपरीत ते ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात. त्या आधारे ते रुग्णांच्या शस्त्रक्रियेची वेळही ठरवतात. मुलांना अक्षर –अभ्यास करण्यासाठी देखील ज्योतिष शास्त्राआधारेच वेळ काढली जाते. प्रत्येक लग्नाचा मुहूर्त असतो. इतकेच नाहीतर राजकीय नेते सुध्दा आपला अर्ज योग्य मुहूर्त पाहूनच भरतात तर शस्त्रक्रिया करताना शुभवेळ पाहण्यास काय हरकत आहे असे ते विचारतात.”पण रंगनाथम आपल्या बोलण्यात हे सांगायला विसरत नाहीत की, तातडीच्या शस्त्रक्रियेत मुहूर्त बघितला जात नाही. रंगनाथम यांनी सांगितले की, अनेकजण मंगळवारी शस्त्रक्रिया करणे अशुभ मानतात. इतकेच नाही काहीजण अमावास्येलाही शस्त्रक्रिया करण्यास नकार देतात. महिला सुध्दा रजस्वला असताना शस्त्रक्रिया करण्यास नकार देतात.

रंगनाथम मानतात की, “ त्यांच्या गावाच्या स्थितीनेच डॉक्टर होण्याची प्रेरणा दिली आणि हेच कारण आहे की ते केवळ गावच नाहीतर सारे श्रीकाकुलम जिल्ह्यातून येणा-या रुग्णांना मोफत इलाज करतात. शस्त्रक्रियेचे सुध्दा पैसे घेत नाहीत. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

भारताचे नाव जागतिक पटलावर नेणाऱ्या वरप्रसाद रेड्डी यांची प्रेरणादायक कहाणी

लोकहित आणि पर्यावरण संरक्षणासाठी बहुमोल योगदान देणारे पुरुषोत्तम रेड्डी 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऑटोरिक्षाचालकाच्या मुलाची युपीएससीच्या परीक्षेत गगनभरारी,जालन्याच्या अन्सार शेखची यशोगाथा

    Share on
    close