फळविक्रेत्यानं बनवली सोलार कार

फळविक्रेत्यानं बनवली सोलार कार

Wednesday December 30, 2015,

3 min Read

नवी दिल्लीतल्या आयआयटी परिसरात भरलेल्या विज्ञान, औद्योगिक एक्स्पोमध्ये आलेल्या सज्जाद अहमद यांचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे आदर्श. सज्जाद या एक्स्पोमध्ये बंगळुरुहून सोलार इलेक्ट्रिक कार घेऊन आले होते. ज्याचं संशोधनही त्यांनीच केलं होतं. हे संशोधन त्यांनी त्याठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अत्यंत उत्साहानं दाखवलं. त्यामुळे सहाजिकच लोकांमध्ये त्याची उत्सुकता वाढली.

image


देशात पहिल्यांदाच भरलेल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (आयआयएसएफ ) मध्ये येण्यासाठी असलेले ३ हजार किलोमीटरच अतंर अहमद यांनी याच सोलार कारमधून पूर्ण केलं होतं. हा प्रवास अवघड होता. ज्यामध्ये त्यांनी विंध्य पर्वताचा टप्पा पार केला. बंगळूरु ते दिल्ली हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना ३० दिवस लागले.

कशी चालते ही कार ?

अहमद यांनी बनवलेल्या या इलेक्ट्रीक कारमध्ये पाच तावदानं आहेत. या प्रत्येक तावदानाची क्षमता १०० वॅट आहे. वेगवेगळ्या उपकरणांनी ही कार बनली आहे. यामध्ये तावदानामुळे निर्माण झालेली उर्जा सहा बॅटरीच्या माध्यमातून मोटार चालवते. कारमध्ये लावण्यात आलेल्या प्रत्येक बॅटरीची क्षमता १२ व्होल्ट आणि १०० एम्पियर आहे. ३ हजार किलोमीटरचं अंतर या कारनं पूर्ण केलं याचा अहमद यांना अभिमान आहे. अहमद यांनी सांगितले, “ यात्रेच्या वेळेस असा प्रसंग आला ज्यावेळी त्यांना वाटलं ही कार उंच तसंच सखल रस्त्यांवर चालू शकणार नाही. हा कठीण रस्ताही या कारने पार केला. या यात्रेच्या दरम्यान त्यांना कोणताही अडथळा किंवा थांब्याचा त्रास सहन करावा लागला नाही".

स्कूल ड्रॉपआऊट ते संशोधक

अहमद यांचा जन्म कर्नाटकमधल्या कोलारमध्ये झाला. बारावीमध्येच शिक्षण सोडणारे अहमद हे एक ड्रॉप आऊट विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीचं दुकान उघडलं. रेडिओ, टेप रेकॉर्डर आणि टिव्ही दुरुस्तीचं काम ते करत असतं. हळूहळू त्यांनी काम वाढवलं. अहमद संगणकाचीही दुरुस्ती करु लागले. समाजासाठी काही तरी करायचं हे त्यांचं लहाणपणापासूनचे स्वप्न होते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतक्या मोठ्या संशोधनाचा विचार केला.

अहमद यांनी युअर स्टोरीला सांगितलं....

"शाळेत असताना पुस्तकातली वैज्ञानिकांची चित्र पाहून मलाही वैज्ञानिक होण्याची इच्छा होती. पण परिवाराचा उदारनिर्वाह चालवण्यासाठी १५ व्या वर्षीच मला शाळा सोडावी लागली. "

image


या परिस्थितीमध्येही समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द आणि संशोधन करण्याची इच्छा त्यांनी जागृत ठेवली. २००२ मध्ये अखेर त्यांना ही संधी मिळाली.

अहमद यांनी सांगितले

" मी स्वत:ला बजावलं आता आपलं वय ५० झालंय. यापूर्वी मी म्हातारा आणि असाह्य होण्यापूर्वी समाजासाठी काही तरी केले पाहिजे."

अहमद यांनी दोन चाकी वाहनामध्ये अशा प्रकारचे बदल केले की ज्यामुळे हे वाहन वीजेवर चालू शकेल. त्यानंतर त्यांनी याच मॉडेलची तीन चाकी आणि चार चाकी वाहनं बनवली. डॉ. कलाम यांच्या सन्मानार्थ कर्नाटक सरकारनं २००६ मध्ये भरवलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या कार्यक्रमात यासाठी अहमद यांचा गौरव करण्यात आला.

आतापर्यंत अहमद देशातल्या वेगवेगळ्या भागात भरलेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. त्यांनी यासाठी तब्बल एक लाख दहा हजार किलोमीटर अंतर पूर्ण केलंय. विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचा प्रवास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रवासात चुलत भाऊ सलीम पाशाही अहमद यांच्यासोबत असतात. सलीम पाशा हे उद्योजक आहेत.

डॉ. कलाम यांनी 'व्हिजन 2020' मध्ये देशाचं कल्याण करण्याचं ध्येय व्यक्त केलं होतं. कलाम यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहमद यांनी हा प्रवास करण्याचं ठरवलंय. लोकांना नव्या कल्पना, तसंच संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करण्याचा संकल्प अहमद यांनी केलाय.

image


बंगळुरुच्या राजभवनातून दिल्लीसाठीचा त्यांचा हा प्रवास एक नोव्हेंबरला सुरु झाला होता. आता घरी जाण्यापूर्वी हरिद्वारला जाऊन गंगामातेचा आशिर्वाद घेणार असल्याचं अहमद यांनी सांगितलं. बाबा रामदेव यांना भेटण्याची अहमद यांची इच्छा आहे. त्यानंतर ते राळेगण सिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत.

लेखक – अनमोल

अनुवाद – डी. ओंकार