अडथळ्यांवर मात करत एक छानशी उंची गाठणारा 'अंकुर'

अडथळ्यांवर मात करत एक छानशी उंची गाठणारा 'अंकुर'

Thursday April 07, 2016,

5 min Read


अंकुर मिश्रा या युवकाच्या प्रत्येक रंध्रातून साधेपणा, सचोटी, मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा पाझरतो. एका खेड्यात राहून प्रत्येक ऋतूचा आनंद लुटला. मोकळ्या श्वासाची गंमत अनुभवली आणि मग मैलोनमैल प्रवास करून, अडथळ्यांवर मात करत एक छानशी उंची गाठणाऱ्या अंकुरला आपण भेटणार आहोत. सर्वसामान्यपणे लहानशा गावात राहणारा आणि मोठी स्वप्न पाहणारा असा हा युवक नाही. हा एक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता, लेखक, कवी आहे मनमुराद भटकंती करणारा अवलिया आहे. स्वतःला झालेला त्रास इतरांना होऊ नये म्हणून नवीन वाट बनवणारा हा अवलिया आहे.

image


उत्तरप्रदेश, चढ आणि उतार

अंकुरच्याच भाषेत सांगायचं तर त्याचं बालपण ‘शुद्ध’ खेड्यात गेलं. त्याच्या खेड्यात वीज नव्हती. आजूबाजूने वेढलेले डोंगर आणि जवळून वाहणारी नदी अशा ठिकाणी त्याचं खेडं वसलेलं आहे. तो सांगतो, “गावातली शाळा लहान आणि उगीचच येता जाता डोळे वटारणारे आणि शिक्षा करणारे शिक्षक अशा शाळेत मी शिकलो. अतिशय गरिब घरात माझा जन्म झाला. मला जवळपास नीटस् शिक्षण मिळालचं नाही. शिष्यवृत्तीपासून तर मी कोसो लांब होतो. तरीही सहावीत असताना मी पहिल्यांदा इंग्रजी वाचलं”.

शाळेतल्या काही घटनांचा त्याच्या मनावर तीव्र परिणाम झाला. यामुळेच अवघ्या १६ व्या वर्षी त्याच्यात जबरदस्त महत्त्वकांक्षा निर्माण झाली. त्याचे एक शिक्षित नातेवाईक, ज्यांना तो ‘बाबा’ असं संबोधतो त्यांच्यामुळे त्याच्यात शिक्षणाची आस निर्माण झाली.

image


अंकुर सांगतो, “शिक्षक चांगले असणे हे विद्यार्थ्याच्या जडणघडणीकरता खूप महत्त्वाचे असतं. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो जर शिक्षक व्यवस्थित नसतील तर मुलं शिक्षणापासून दूर निघून जातात. शिक्षकांचं मुलांशी वर्तन सौहार्दाचंच असलं पाहिजे. मला फळ्यावर लिहिलेलं नीट वाचता आलं नाही, तेव्हा माझ्या शिक्षकांनी वर्गात माझ्या थोबाडीत मारली. बऱ्याचदा खेड्यातल्या शिक्षकांचं शिकवण्याकडे लक्षच नसतं. कदाचित योग्य गावात नेमणूक मिळाली नसल्यानं अस असू शकतं. पण या सर्वाचा वाईट परिणाम खेड्यातल्या मुलांच्या शिक्षणावर होतो. शिक्षणाचा दर्जा खालावतो आणि विदयार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतात”. बारावीत असताना अंकुरला वाटू लागलं की, आठवड्याच्या शेवटी त्याच्याकडे रिकामा वेळ बऱ्यापैकी आहे. मग या वेळेचा सदुपयोग करावा असं त्याला वाटलं. त्याने ‘युनिक एज्युकेशनल ग्रुप’ सुरू केला.

त्याने बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांच्या अध्यक्षांशी आणि स्वयंसेवकांशी संपर्क साधला. आणि मग विद्यार्थ्यांकरता गणित आणि विज्ञानाचे विशेष वर्ग सुरू झाले. अंकुर सांगतो, “गणित मला अतिशय आवडतं. मुलांना आकडेमोड करायला खूप आवडते. त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आकडे मोजायला, गणित सोडवण्यात रस असतो. मी त्यांना गणिताचा वापर त्यांच्या रोजच्या जीवनात कसा करता येईल हे दाखवतो. त्यांना पालकांना घरचं बजेट बनवायला कशी मदत करता येईल हे सांगतो”.

गावातल्या दोन शाळांमध्ये सुरूवात केल्यावर विद्यार्थ्यांची उत्सुकता, शिकण्याची उर्मी वाढू लागली आणि लवकरच ते गावात ‘फेमस’ झाले. अवघ्या दोन वर्षातच त्यांच्या आठवड्यांची वाटणी होऊन ते १७ गावातल्या शंभरच्या आसपास शाळांमध्ये विशेष वर्ग घेऊ लागले. यातून अंकुरला आता त्याच्या खर्चाकरता काही पैसेही मिळू लागले.

आता अंकुरला त्याच्या करिअरकरता गावाबाहेर पडण्याची वेळ आली. त्याच्या या विशेष वर्गात आता त्याच्या हाताखाली तयार झालेले विद्यार्थी वर्ग घेऊ लागले. पण त्याची शिकवण्याची उर्मी त्याला गुडगावला आल्यावरही स्वस्थ बसू देईना. मग त्याने तिथेही दहा विद्यार्थ्यांसोबत त्याच्या या स्टार्टअपची सुरूवात केली.

image


कॉम्प्युटरसोबत पहिली मुलाखत

विश्वास नाही बसणार, पण या तंत्र विशेषज्ञाची आणि संगणकाची पहिली गाठ पडली ती त्याच्या बीटेक कॉलेजच्या पहिल्या दिवशी. बीटेक झाल्यावर त्याने मायक्रोसॉफ्ट सोबतच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनमध्ये प्रोग्रामर आणि डेव्हलपर म्हणून काम केलं. पण तो त्याच्या ह्या ‘टेक-गीकडोम’ चा उपयोग तांत्रिक गोष्टी माहीत नसणाऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता आणि तंत्रज्ञानाची अनुभूती घ्यायला करतो. डिजिटल भारताकरता विद्यार्थ्यांना किंवा लोकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना वेबच्या जवळ आणण्याच्या प्रयत्नात तो आहे. म्हणजेच आणखी एक स्टार्टअप. पण हा स्टार्टअप असेल ‘स्टार्टअप सुरू करणाऱ्यांकरताचा स्टार्टअप’! स्टार्टअप सुरू करताना काय गोष्टींची आवश्यकता असते, डिझाईनिंग, डेव्हलपमेंट आणि मार्केटींग यासर्व गोष्टी एकाच छताखाली मिळू शकतात. अंकुर म्हणतो, “सध्या स्टार्टअप्स समोरची सर्वात मोठी डोकेदुखी आहे, साधनांची. विशेषतः डेव्हलपर्स आणि डिझाइनिंग, विकास आणि मार्केटिंग यासर्व गोष्टी एका ठिकाणी उपलब्ध असणं. मी हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत आहे. स्टार्टअप आमच्याकडे आल्यावर त्यांनी त्यांचे सर्व डिजिटल प्रश्न आमच्यावर सोपवून निश्चिंत राहावं. आम्ही त्यांचं निराकरण करू”.

अवघ्या एका वर्षात या कंपनीनं विंगो, बनियागिरी यासारख्या स्टार्टअप्ससोबत काही सरकारी प्रकल्प मिळून शंभर प्रकल्प तयार करून दिले.

तंत्रज्ञानाच्या प्रेमात पण लेखणीच्या सहवासात

अंकुरला त्याच्या शालेय जीवनात आलेल्या काही कटू अनुभवांमुळे लेखणीशी जोडला गेला. तो कथाकारही आहे. १६ व्या वर्षीच त्याचे शिक्षकांविषयीचे लेख प्रकाशित झाले.

या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं अंकुर सांगतो. मग त्याची ही लेखणीवरची घोडस्वारी वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय विषयांवर वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये लेख लिहिण्याकडे वळली. पुढे मग तो कादंबरीकार म्हणूनही चर्चेत आला. ‘लव्ह स्टिल अँड आय फ्लर्ट’ आणि ‘क्षणिक कहानियों की इक विरासत’ या पुस्तकांना वाचकांची चांगली पसंती मिळाली. काही दिवसांतच त्याचं ‘लव्ह एट मेट्रो’ पुस्तकही प्रकाशित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा हिंदी कवितासंग्रहही प्रकाशित झालाय.

अंकुरने महिनाभरापूर्वीच कवींकरिता कविशालाडॉटइन ही वेबसाईट सुरू केली आहे. यावर कवितांची ऑनलाइन मैफिल रंगते. साधारण ५० कवींनी आपल्या शंभर एक कविता यामाध्यमातून प्रकाशित केल्या आहेत. 

image


वीजही उपलब्ध नसणाऱ्या लहानशा खेड्यातून येऊन इंजिनिअर, उद्योजक आणि बहुभाषिक लेखक अशा वाटेवर चालत असताना, अंकुरचं ध्येय मात्र निश्चित झालं. त्याला त्याच्या ज्ञानाचा दिवा घेऊन गरजूंकडे जाऊन त्यांना प्रकाशात आणायचंय. तो म्हणतो, “मी जाहीर सभांमध्ये व्यासपीठावर बोलायला कधीच घाबरत नाही”.

अंकुर तळागाळातलं राजकारण, तंत्रज्ञान आणि समाज याविषयावर माहितीपूर्ण बोलतो. आतापर्यंत २५ परिसंवादात तो वक्ता म्हणून सहभागी झाला आहे. टेडएक्सपटना, इग्नाइट जयपूर, मायक्रोसॉफ्ट टेक डेज, युइएन समीट यासारख्या परिसंवादात त्याने आपले विचार मांडले आहेत.

या अवघ्या पंचविशीतल्या चिंगारीला आयुष्यातले चढ-उतार म्हणजे जगण्यातली अनुभूती वाटते. अंकुर म्हणतो, “हिंदीवर प्रभुत्व असल्यामुळे मी मोठमोठ्या व्यासपीठांवर बोलतो, पुस्तक लिहितो, ब्लॉग लिहितो आणखीही माझं बरचं काही सुरू असतं. आणि हे कोणीही करू शकतं. एका अनोळखी शहरात, पुरेसे पैसे नसतानाही मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. तर तुम्ही का नाही उभे राहू शकणार?”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

जगातील शक्तिशाली उद्यमींच्या यादीत ९व्या स्थानावर 'डेक्स्टरिटी' ग्लोबलचे संस्थापक शरद सागर 

उद्योजकतेच्या जगतात सांगलीचा ठसा उमटवणाऱ्या पयोद उद्योगसमूहाच्या देवानंद लोंढे यांची यशोगाथा

‘राज्यस्थान इंस्टीटयूट’ बनले अलवर गावातील मुलांसाठी एक प्रेरणास्थान

लेखिका – बिंजय शाह

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

    Share on
    close